Monday, 10 February 2014

शालिवाहन-१

शालिवाहन 

गौतमी आणि तिचा पुत्र शतकर्णीला तिच्या भावांनी शतकर्णीच्या वडिलांच्या मृत्युनंतर खरोखरच घराबाहेर काढून टाकले. वडिलांच्या विना पोरका झालेला शतकर्णी आणि त्याची आई गौतमी नशीब नेईल तिकडे मजल दरमजल करीत भटकत होते. 
थोड्याच दिवसात ते दोघे प्रतिष्ठान (आताचे पैठण) नावाच्या अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर अश्या नगरीजवळ पोचले. इतक्यात कुणाकडे तरी आपल्या आईचे लक्ष वेधून शतकर्णी म्हणाला, "आई! तो मनुष्य बघ काय करतो आहे?"  शतकर्णी बाळा!, "अरे तो एक कुंभार  आहे आणि तो त्याच्या चाकावर मातीचे भांडे घडवतो आहे." गौतमी उत्तरली. 
कुतूहलाने धावतच त्या कुंभाराजवळ जाऊन त्याला छोटा शतकर्णी म्हणाला, "म्हातारबाबा, मला तुम्ही अशी मातीची भांडी  बनवायला शिकवणार ना?" त्याच्या उत्सुकतेमुळे आणि ज्ञान प्राप्तीची तीव्र इच्छा ओळखून तो कुंभार त्याला आश्वस्त करीत म्हणाला, "शिकवीन रे माझ्या राजा! आता तसेही माझे हातपाय काम करू शकत नाही आणि माझी कला योग्य हातात देणंही मला गरजेचा वाटतंय." तू मन लावून शिकशील ना ? हो तर, मला खूप आवडेल शतकर्णी म्हणाला. 
"शतकर्णी त्यांना त्रास नको देऊस" गौतमी बोलली. असू दे असू दे, मी खरच शिकवीन त्याला, मुली. आणि तुम्ही दोघेही फार दुरून आलेले दिसत आहात. थोड्या वेळ थांबा की माझ्या कडे? म्हातारबाबा उत्तरले. 
त्या सद्गृहस्ताची आपुलकीची वागणूक आणि मायेने गौतमी खूप आश्वस्त झाली आणि स्वतःवर ओढवलेला दु:खद प्रसंग तीने त्यांना कथन केला. यावर अधिकारवाणीने त्या म्हाताऱ्या गृहस्ताने त्या दोघांना आपल्या घरिच ठेवून घेतले. गौतमी आपल्या वडिलांप्रमाणे त्यांची काळजी घेत असे आणि छोटा शतकर्णी त्यांना कामात मदत करीत असे. असे करत करत शतकर्णी मातीपासून विविध उपयोगी भांडी आणि खेळणी बनविणे शिकत शिकत मोठा होत होता. 
आणि  शतकर्णीच्या आयुष्याला पुन्हा कलाटणी देणारा तो दिवस आलाच. त्या उन्हाळ्यातील अतिशय उकाड्याच्या दिवशी एक तेज:पुंज साधू तीर्थयात्रा करीत असताना त्यांच्या  घराजवळ आला. तहानेने व्याकूळ झालेल्या त्या साधूने शतकर्णीला पिण्यास पाणी मागितले. शतकर्णी पाणी आणण्यास आत गेला असताना तो साधू म्हणाला हि तुमची प्रतिष्ठाननगरी खरोखरच अतिशय सुंदर आणि संपन्न आहे. यावर तो म्हातारा कुंभार म्हणाला, " महाराज खरच आहे, पण हल्ली काही डाकू वारंवार अमच्या ह्या सुंदर नगरीवर आक्रमण करून आम्हा सर्वाना फार त्रास देताहेत." इतक्यात शतकर्णी पाणी घेऊन येतो. 
"मान्यवर, आपण मजकडे अशे टक लावून का बघता आहात?" शतकर्णीने आदरपूर्वक त्या साधुस विचारले. यावर तो साधू स्मित करीत म्हणाला, " बाळा, एक दिवस तू ह्या प्रतिष्ठान नगरीचा राजा होणार हे मला आताच दिसत आहे. आणि तो दिवस ह्या नगरीसाठी अतिशय शुभ दिवस असेल." माझे बोल खोटे ठरणार नाहीत. 
एका गरीब विधवेचा मुलगा आणि एका म्हाताऱ्या कुंभाराकडे शिकणारा हा पोरगा कसला राजा बनतोय?  अश्या विचाराने गौतमी आणि तो कुंभार पुन्हा आपल्या कामाला लागले आणि लवकरच सर्व विसरूनदेखिल गेले. पण शतकर्णीला त्या साधूचे उद्गार सतत जागरूक ठेवत होते. "मला जर राजा बनायच असेल तर सैन्य, हत्ती, घोडे, रथ, शस्त्र वगैरे लागणार, मग मीच माझा शस्त्रसज्ज सैन्य तयार करीन," शतकर्णी आपल्या मनाशीच विचार करीत होता. पण नुसता विचार करून तो थांबला नाही, त्याने मातीचेच सैनिक, हत्ती, रथ, घोडे आणि शस्त्रे बनविणे सुरु केले. हे त्याचे सैन्य आणि मातीतून साकारलेले ते छोटेसे जग खरोखरच अतिशय सुबक होते. ते सर्व खेळ बनवून शतकर्णी मात्र सर्व एका पाणी नसलेल्या विहिरीत टाकीत असे। आणि आईने किंवा कुंभाराने विचारल्यास, " ती खेळणी नव्हेत तर ते माझे सैन्य आहे आणि राजा झाल्यावर मला त्यांची गरज पडणार आहे." असे तो उत्तर देत असे. 
आता शतकर्णी मोठा झाला होता. आणि मित्रांसोबत जंगलात तो खेळायला जात असे. एका मोठ्या शाली नावाच्या वृक्षावर बसून तो सर्व मित्रांचा खेळातला राजा होत असे आणि त्या शाली च्या झाडाची फांदी त्याचे वाहन. आणि त्याचे मित्र म्हणून त्याला 'राजा शालिवाहन' असे म्हणून याची स्तुती करत. 
एका सायंकाळी असेच खेळत असताना त्या तरुण पोरांना काही इ खलबत चालू असल्याचा आवाज झाडांमागून आला आणि म्हणून ती पोरं लपून ऐकू लागली. ती खलबत डाकूंची होती. आणि एका सोन्याच्या व्यापारयाची सोनेचांदी आदींनी भरलेली गाडी गावात शिरण्याच्या आधीच लुटण्याची त्यांची योजना चाललेली होती. त्या रात्री मात्र डाकू लोकांचा हल्ला उधळून लावत शालिवाहन आणि त्याच्या मित्रांनी प्रतिष्ठान नगरीचे रक्षण करून दाखविले. शालिवाहनाला धडा शिकविण्यासाठी दुसर्याच दिवशी त्या दकुनि त्यांच्यावर हल्ला केला. पण त्या शूरवीर मुलांनी अगदी सहज तो हल्ला परतवून लावला. मग काय रोजच ती मुले नगरीचे रक्षणासाठी रात्रंदिवस पहार देवू लागली. आणि आतील सुजन नागरिकांनी त्यांना शस्त्रे, धन, आणि घोडे देऊ केलेत. आता ते शस्त्रसम्पन्न देखील झाले होते. खरोखर त्या डाकू लोकांवर आता चांगलाच वाचक बसला होता.
पण त्या डाकूंनी वेषांतर करून व्यापाऱ्याच्या वेशात राजा नहपाणकडे उलटी शालिवाहनाचीच तक्रार केली कि तो एक कुंभाराकडे काम करणारा नगरातील नागरिकांना फार त्रास देत आहे. राजा नहपाण मोठे सैन्य घेऊन प्रतिष्ठान नगरीवर चालून गेला. पण आपण स्वत: आपले मित्र संख्येने कमी असल्यामुळे आपला पराभव होऊ शकेल हा विचार करून शालिवाहन आपल्या विहिरीजवळ गेला. असे म्हणतात कि त्या विहिरीतील मातीच्या सैन्यामध्ये त्या शालिवाहनाने खरोखर प्राण फुंकले आणि त्या सैन्यासह त्याने उन्मत्त राजा नहपाण आणि त्याच्या सैन्याचा पराभव केला. 
फार वर्षांपूर्वी त्या साधूने केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे शालिवाहन आता प्रतिष्ठानचा राजा झाला होता. 

भाग-१ समाप्त. 
पुढील भागात-- भाग-२ शालिवाहन आणि गुणाढ्य 
                         भाग-३ शालिवाहन आणि विक्रमादित्य