राजा दिलीप
एकदा देवल मुनींना शरभ ऋषींनी विचारले की, " हे मुनिवर्य, हा राजा दिलीप कोण होता? आणि जिची उपासना केल्याने त्यास पुत्रप्राप्ती झाली ती नंदिनी कोण होती?
ह्या प्रश्नावर देवल उत्तरले, "दिलीप हा वैवश्वत मन्वंतरातील एक थोर राजा होता . तो त्याच्या प्रजेशी अत्यंत न्यायाने वागत असे आणि प्रजाजनांना सुखी ठेवत असे. अनेक वर्ष झाल्यावर देखील त्याला आणि राणी सुदक्षिणा ह्यांना मुलबाळ झाले नव्हते. दिलीप विचार करी की, मी काहीही पातक केले नसताना मला मूलबाळ का नाही? मी असाच निघतो आणि आमचे गुरु वसिष्ठ ह्यांनाच याबद्दल विचारतो. हा विचार करून तो राणी सुदक्षिणा हिला घेऊन सायंकाळी वासिष्ठांकडे गेला. वसिष्ठ
ऋषी आणि त्यांची पत्नी सती अरुंधती यांचे वंदन करून ते दोघे जवळच आसनस्थ झालेत.
ऋषींनी राजाचा हात मोठ्या प्रेमाने थोपटत त्यांस विचारले, "हे राजा ज्या
राज्यात सर्व प्रजा अत्यंत सुखी आहे, सर्व लोक धर्माचरणाने ,वागत आहेत,
सैनिक त्यांचा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त आहेत अश्या तुझ्या सारख्या
राजाला स्वर्ग प्राप्तीची काय गरज?" आणि "तुम्ही दोघे असे उदासीन का दिसता
आहात? प्रत्यक्ष स्वर्ग ज्याच्या राज्यात अवतरला आहे अश्या राजा दिलीपास
इकडे गहन अरण्यात मजकडे यायची काय गरज आहे? इक्ष्वाकू कुळातील तू तर
तुझ्या पुत्रास अभिषेक झाल्यानंतरच वानप्रस्थश्रम स्विकारण्यास ह्या निबिड तपोवनात यायला हवे होते."
राजा उत्तरला, "हे प्रभो, मी इथे तपस्या करण्यास नव्हे तर काही गंभीर प्रश्न घेऊन तुमच्याकडे आलो आहे. जसे माझे शैशव बघता बघता संपून तारुण्य प्राप्त झाले तसेच मला तर वाटते कि पुत्रमुख न पाहताच मला वार्धक्य येणार. जर मला मुलबाळ झाले नाही तर मजनंतर ह्या पृथ्वीचा सांभाळ कोण करणार? ह्याबद्दल जबाबदार कोण? माझ्या हातून काही पातक झाले का? तसे असेल तर मला काही सांगाल काय?"
वसिष्ठ यावर उत्तरले, " हे राजन, फार पूर्वी तू तुझ्या महालात परतत असताना बाजूला कल्पवृक्षाखाली उभ्या असणाऱ्या कामधेनुकडे तू दुर्लक्ष केले होतेस. तेव्हा ती कामधेनू रागावली आणि तिने तुला शाप दिला की, तू माझ्या मुलीची सेवा केल्याशिवाय तुला पुत्रप्राप्ती होणार नाही." म्हणून तू तुझ्या पत्नी समवेत आता "नंदिनीची" (कामधेनूची पुत्री) सेवा करायला हवीस. तेव्हा नंदिनी आश्रमातच उभी होती. वसिष्ठांनी तिची सेवा करण्याची आज्ञा राजास दिली.
देवल मुनी म्हणाले, " दुसऱ्या दिवशीपासून सुदक्षिणा नंदिनीची मनोभावे सेवा करू लागली आणि दिलीप तिला चरण्यासाठी वनात नेऊ लागला. ती खाली बसल्यावरच तो देखील बसे, तिने पाणी पिल्यानंतरच तो पाणी पीत असे. तो तिला खाऊ घालीत असे, तिला किडे, माश्यांच्या त्रासापासून वाचवीत असे. आश्रमात परतल्यावर राणी तिची पूजा करी. असे २१ दिवस झालेत आणि राजाची परीक्षा घेण्यासाठी नंदिनी हिमालयातील एका गुहेत शिरली. ती गुहा एका सिंहाची होती आणि त्या सिंहाने नदिनिवर आक्रमण केले. नंदिनी जोरजोरात हम्बरडे फोडू लागली. ते ऐकून राजा आत शिरला आणि त्याने त्या सिंहावर बाण रोखून धरला. परंतु सिंहाने दिलीप लकवा मारल्यागत जागीच खिळून राहिला. तो बाण सुद्धा सोडू शकला नाही. तो दिग्मूढ तसेच आश्चर्यचकित झाला.
सिंहाचे मनुष्यवाणीतील बोलणे ऐकून त्याच्या आश्चर्यास पारावर राहिला नाही. सिंह म्हणाला, " हे राजन, तू सुर्यावंशातील राजा दिलीप आहेस हे मी ओळखले आहे. प्रत्यक्ष भगवान शंकर त्यांच्या नंदीवर बसून माझ्यावर त्यांचा पाय ठेवून आहेत. म्हणून तू मला मारू शकणार नाहीस. तू आता परत जा आणि स्वतःचा जीव वाचव. हि गाय आता माझे भक्ष्य आहे. प्रत्यक्ष देवानेच तीस मजकडे पाठवले आहे.
राजा बोलला, " अरे सिंहा, माझ्या गुरुनी नंदिनीची काळजी आणि रक्षण करण्याचे दायित्व मला सोपवले आहे. आतापर्यंत मी तिची चांगली काळजी घेत आलो आहे. मी तिला रोज पुजतो. प्रत्यक्ष शंकर भगवान तुझ्या सोबत असल्याने मी तुझ्या तावडीतून बळजबरीने तिची सुटका करु शकणार नाही हे मला कळते आहे. नंदिनीच्या बदल्यात तू मला खा पण तिला कृपया सोडून दे." असे करण्याने ऋषींच्या आश्रमातील नित्य नैमित्तिक कार्याला नंदिनीचा होणारया उपयोगाला देखील आश्रम वासियांना मुकावे लागणार नाही, तसेच तुझी भूक देखील भागविल्या जाईल. आणि मला देखील गायीचे प्राण वाचविल्यामुळे सद्गती मिळेल.
हे ऐकून तो सिंह जर शांत झाला. राजाने त्या समोर आपले मस्तक झुकविले आणि तो सिंह आपणास आता खाईल याची वाट बघू लागला. पण सिंहाच्या तीक्ष्ण नखांचा स्पर्श होण्याऐवजी आकाशातून दिलीप राजावर पुष्पवृष्टी होऊ लागली. "वस्ता उठ", राजाने ऐकले. तो उठून बघू लागला तर सिंह तिथे नव्हता. नंदिनी म्हणाली, " हे राजा, हि माझी माया होती. प्रत्यक्ष यमराज आले तरी ते माझे वाईट करू शकत नाहीत. स्वतःच्या
प्राणांचा त्याग करून तू माझे रक्षण करण्यास तयार झाला. हे बघून मी प्रसन्न झाली आहे. हवा असलेला वर तू मला माग. मी नक्कीच तो पूर्ण करीन. दिलीप डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, " हे देवी, तुझ्या पासून काय लपून आहे? माझ्या वंशाचे नाव पुढे असेच कीर्तिमान करणारा पुत्र मला हवा आहे."
नंदिनी यावर हसून उत्तरली, " हे राजन, पानांचा द्रोण करून तू त्यात माझे दुध भरून घे आणि ते दुध पिल्यावर तुला सर्व शस्त्रविद्येत पारंगत असा पुत्र प्राप्त होईल. "हा संवाद झाल्यावर नन्दिनिसह राजा दिलीप आश्रमात परतला.
लवकरच राजा दिलीप आणि राणी सुदक्षिणा ह्यांना पुत्ररत्नचि प्राप्ती झाली. मुलाचे नाव ठेवण्यात आले रघू. पुढे रघु राजाच्या नावानेच इक्ष्वाकू वंश हा रघु वंश ह्या नावानेही जगात मान्यता प्राप्त झाला.
No comments:
Post a Comment